प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्वाच्या क्षेत्रातील विठ्ठल होते : डॉ. यशवंत पाटणे
फलटण : पैसा, वेळ आणि ऊर्जा या जीवनाच्या खर्या गरजा आहेत. पण आजच्या समाजाची धावपळ केवळ पैसा मिळवण्यासाठी सुरू असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत समाजाला त्याच्या भौतिक गतीची जाणीव करून देण्याची जबाबदारी वक्त्यांवर आली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे संस्कार मन घडवले. वक्तृत्वाच्या क्षेत्रातील ते विठ्ठल होते, असे मत लेखक, वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.
एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह पुणे येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान डॉ. यशवंत पाटणे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठान (मुंबई) व वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चिरंजीव संजीव भोसले, स्नुषा सौ. रंजना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटणे म्हणाले, आज वाढता धर्मद्वेष बघितल्यानंतर समाजजीवन दुभंगत चालल्याचे दिसून येते. एका बाजूला अतिरेकी चंगळवाद बघितल्यानंतर संस्कृतीला आणि दुसरीकडे मूल्यहीन राजकारणामुळे राज्यघटनेला तडे जात आहेत. यामुळे पोटा-पाण्याचा प्रश्न दुर्लक्षित होत असल्याने अशा परिस्थितीत तरुणांनी कोणाकडे पहायचे? कोणाचा आदर्श घ्यायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा समाज विवेकानंद आणि ज्ञानोबांच्या विचारांना विसरत चालला असून तो चंगळवादाकडे जास्त आकर्षित झाला असल्यामुळेच आज बोलणार्या वक्त्यांची समाजाला गरज असून अशा परिस्थितीतून समाजाला जागे करण्याची वेळ आली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व म्हणजे मनन आणि चिंतन यांचा सुरेख मिलाप होता. त्यांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे प्राचार्य यशवंत पाटणे आणि प्रा. मिलिंद जोशी म्हणजे नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे खंदे वक्त्याचे प्रतीक आहेत. मी आजही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पाईक असून त्यांचे संस्कार व विचारांचे बोट सोडले नसल्यामुळेच मी उभा आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी ते जिल्हाधिकारी असताना पुण्यातील साहित्य क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला.
प्रा. मिलींद जोशी म्हणाले, विचारांचा अखंड तेवणारा नंदादीप व वक्तृत्वाचा मानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचे व महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती समृद्ध करण्याचे कार्य आयुष्यभर मनोभावे केले. या श्रवणसंस्कृतीमध्येच आम्ही समृद्धपणे वाढलो. या वाटचालीत प्राचार्यांच्या वक्तृत्वाची शैली आम्ही आत्मसात केल्याची टीका आमच्यावर झाली असली तरी आम्हाला ती मान्य होती, कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले हे प्रबोधनाचे विद्यापीठ असून या विद्यापीठातील मी एक विद्यार्थी आहे असेच मी आजही समजतो.
अमर शेंडे म्हणाले, वाचन संस्कृतीमध्ये योगदान दिल्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा केलेला सन्मान हा निश्चितच प्रेरणादायी असून माझे मार्गदर्शक गुरुवर्य रवींद्र बेडकिहाळ यांच्या साठ वर्षांच्या पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा हा सन्मान आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, साहित्य परिषद पुणे शाखेच्या कोषाध्यक्ष सौ. सुनीताराजे पवार, सदस्य अॅड. प्रमोद आडकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, डोंबिवली येथील सतीश फौजदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. उपस्थितांचे स्वागत प्रा. मिलिंद जोशी व सौ. रंजना भोसले यांनी केले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
