ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी केलेल्या अविरत संघर्षाचा स्मरण करण्याचा प्रेरणादायी दिवस होय. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, जपलेल्या मूल्यांचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा थोडक्यात आढावा.
फलटण शहर, तालुका आणि सातारा जिल्ह्यात आपल्या प्रभावी लेखणी व ओजस्वी वाणीद्वारे प्रा. रमेश आढाव यांनी समाजमनावर कायमस्वरूपी ठसा उमटविला. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी कृषी, उद्योग, शिक्षण, कामगार तसेच समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर सामान्यांच्या अपेक्षा व अडचणी अत्यंत प्रभावीपणे मांडत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची पत्रकारिता केवळ बातमीपुरती मर्यादित न राहता ती समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली.
ज्यावेळी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांची तड लागत नाही, असे स्पष्ट होत असे, त्यावेळी प्रा. रमेश आढाव यांनी तालुक्यातील विविध व्याख्यानमालांच्या माध्यमातून, प्रसंगी संबंधित गावात जाऊन तेथे सभा घेऊन आपल्या प्रभावी वाणीद्वारे या प्रश्नांची प्रभावी शब्दांत मांडणी करून, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संबंधित घटकाला जागच्या जागी न्याय मिळवून दिला आहे. किंबहुना, त्यांच्या वाणी आणि लेखणीची ही खासियत होती, असे म्हणावे लागेल.
वृत्तपत्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध खात्यांच्या योजना संबंधित पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी प्रा. रमेश आढाव यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. लाभ कोणी घेतला, तो पात्र होता की नाही, याची शहानिशा करण्यापेक्षा जो खरोखर पात्र होता किंवा आहे; मात्र संबंधित शासकीय यंत्रणा त्याला लाभ देण्यास टाळाटाळ करीत असेल, तर प्रसंगी संबंधित पात्र लाभार्थ्यासमवेत त्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारून आपल्या समवेत आलेल्या पात्र लाभार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका कधीही विसरता येणार नाही. त्याचप्रमाणे, यापुढे अशा अन्यायग्रस्त पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी पुढे येईल, अशी शक्यताही कमी असल्याने, केवळ प्रा. रमेश आढाव यांच्या आठवणींना उजाळा देताना समाजमनासमोर त्यांच्या कार्याची बाजू मांडून, त्यातून नव्या पिढीत प्रा. रमेश आढाव यांच्यासारखी धाडसी, संवेदनशील आणि निर्णायक भूमिका घेणारे तरुण निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही.
फलटण येथील वृत्तपत्र कार्यालयात सकाळी दहा ते रात्री दहा अशी जवळपास बारा तासांची त्यांची उपस्थिती असायची. लेखन-वाचनाबरोबरच तेथे येणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांची ते संयमाने गाऱ्हाणी ऐकत. आवश्यक ते मार्गदर्शन करणे, संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून मदत मिळवून देणे किंवा गरज पडल्यास स्वतः संबंधित कार्यालयात जाणे, हे त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग होता. एखाद्या गावातील दहशतीने त्रस्त असलेल्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन, तेथील अधिकाऱ्यांना या कुटुंबाला विनाकारण होणाऱ्या त्रासापासून कायमची मुक्ती देण्यासाठी ठोस भूमिका घेणारे, काही प्रसंगात प्रत्यक्ष त्या गावात जाऊन गावाची बैठक घेऊन, तेथील परिस्थितीची गावातील प्रमुख मंडळीसह ग्रामस्थांना कल्पना देऊन, एखाद्या कुटुंबाला अशाप्रकारे होणारा त्रास गावाच्या बदनामीला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आणून देऊन, गावातील हा प्रश्न गावातच निकाली काढण्यासाठी ठोस भूमिका घेऊन, ग्रामस्थांना आणि दहशत निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला एकत्र आणून या प्रश्नाची सोडवणूक करण्यातही प्रा. रमेश आढाव यांनी घेतलेली भूमिका सर्वश्रुत आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत किंवा विकास सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मिळणाऱ्या सुविधा व्यवस्थित मिळतात की नाही, याची सातत्याने दखल घेत, तसेच गावात जाणारे रस्ते, मुख्य रस्त्याला जोडणारे ग्रामरस्ते, शेतमाल बाहेर काढण्यासाठी किंवा शेतमशागतीसाठी शेतात जाणारे रस्ते यांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी संबंधित गावात जाऊन बैठका घेऊन, योग्य समन्वय साधत मार्ग काढण्याचे प्रयत्न प्रा. रमेश आढाव यांनी सातत्याने केले.
वृत्तपत्र क्षेत्रात सलग २५-३० वर्षे काम केल्यानंतर या क्षेत्रातील, विशेषतः ग्रामीण पत्रकारांच्या समस्या, प्रामुख्याने त्यांना मिळणारे मानधन, जाहिरात कमिशन मिळण्यात येणाऱ्या अडचणी किंवा स्वमालकीची साप्ताहिके, मासिके चालविणाऱ्या पत्रकारांना शासन धोरणाचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी याबाबत सतत संबंधित यंत्रणेशी, वृत्तपत्र संपादकांशी चर्चा घडवून आणून पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रा. रमेश आढाव यांनी प्रयत्न केले आहेत. एखाद्या पत्रकारावर अन्याय झाल्यानंतर मजबूत संघटनेच्या माध्यमातून त्याचा प्रतिकार करण्यासाठी आघाडीवर राहून त्यांनी नेहमीच ठोस व निर्णायक भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी संघटनेचे नेतृत्वही केले आणि संघटना मजबूत करण्याला प्राधान्य देऊन आपल्या मूळ क्षेत्रातही संयम आणि संस्कृतीने काम करताना तेथेही आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांना या सर्व कामात नेतृत्व करणारी मंडळी खमक्या वृत्तीची असली पाहिजेत, अशी अपेक्षा होती. मात्र तसे आढळून येत नसल्याने आपण स्वतःच समाजाचे नेतृत्व केले पाहिजे, तरच समाजाला न्याय मिळेल, या भूमिकेतून त्यांनी गुणवरे ग्रामपंचायत निवडणूक लढवली. तेथे उपसरपंच पदावरून सरपंच पदावर निवडीचा निर्णय होण्यापूर्वीच त्यांचे अकाली निधन झाले. त्यापूर्वी अनेकांनी त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची विनंती केली होती. मात्र चर्चेदरम्यान तो विषय मागे पडला असताना त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. त्यामध्ये यश-अपयशापेक्षा निवडणूक प्रचारादरम्यान लोकप्रतिनिधींकडून समाजाच्या असलेल्या अपेक्षांची अत्यंत प्रभावी मांडणी करून प्रा. रमेश आढाव यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली आणि त्यांना मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे नाकारता येणार नाही.
प्रा. रमेश आढाव सर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना, त्यांनी जपलेली निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, न्यायासाठीची निष्ठा आणि लोकसेवेची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करणे, हीच त्यांच्या जयंतीला खरी आदरांजली ठरेल.
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...