एकता दर्शन (फलटण) : फलटणमध्ये मी सभा घेण्यासाठी नाही तर फलटणच्या स्वाभिमानासाठी, लाडक्या बहिण भावाच्या उज्वल भविष्यासाठी, भय मुक्त आणि दहशतमुक्त फलटण देण्यासाठी आलो असल्याचे सांगत नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे व टीमला विजयी करण्याचे आवाहन करत सुरक्षित आणि सुसंस्कृत फलटण नगरी उभी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फलटणकर जनतेला दिली.
शिवसेना पक्ष व आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फलटण गजानन चौकातील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते, यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा.आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, नितीन भैय्या भोसले, नीता मिलिंद नेवसे, दत्तात्रेय अनपट, चंद्रकांत जाधव, विराज खराडे, नंदिनी गायकवाड, नानासाहेब ऊर्फ पिंटू इवरे आदी प्रमुख उपस्थित होते.
"फलटणचे नाव देशभरात गाजे,
निवडून आणा श्रीमंत अनिकेतराजे"
अशा खास शैलीत शिवसेना व आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे सुरुवातीलाच आवाहन करत एकनाथ शिंदे म्हणाले, आज सभेसाठी चारी बाजूला कार्यकर्त्यांची मोठी फौज रस्त्यावर उतरली आहे. या कार्यकर्त्यांनी फक्त आपल्या जवळच्या लोकांना "धनुष्यबाणाला मतदान करा, अनिकेतराजेंना मतदान करा", असे सांगितले तरी विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फलटणच्या विकासासाठी एकदा संधी द्यावी, त्या संधीचे श्रीमंत अनिकेतराजे सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मी जसं धाडसी निर्णय घेतो तसेच रामराजेंनी सुद्धा धाडसी निर्णय घेतला आहे. राजे गटाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. रामराजे यांनी सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फलटणच्या विकासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. रामराजेंचे मी मनापासून अभिनंदन करतो. फलटणमध्ये इतिहास घडवण्याचे काम रामराजे करत आहेत. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. रामराजे हे अनुभवी प्रगल्भ नेते आहेत. स्वतःला व माझ्या परिवाराला काय मिळेल यापेक्षा या राज्याला व फलटणला काय मिळेल हा विचार रामराजे यांनी केला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
१९९१ साली नगराध्यक्ष झालेल्या रामराजेंनी राज्याच्या राजकारणात मोठी झेप घेतली. ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्याचे जलसंपदा मंत्री होते. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या. विधान परिषदेचे ते सभापती होते. त्यांनी सर्वोच्च पद भूषवले. काही जणांनी रामराजेंच्या विरोधात कटकारस्थानी केली असली तरी शेर कभी बुढा नही होता है | चाहे वो जंगल का हो या राजनीती का हो | शेर शेर ही होता है | अशा शैलीत रामराजे हे राजकारणातला वाघ असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रामराजेंनी सुरू केलेली समाजसेवा आणि विकास श्रीमंत अनिकेतराजेंच्या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. जनसेवेच्या चार पिढ्यांचा वारसा लाभलेले राजे कुटुंबीय निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे सांगत अनिकेतराजेंच्या नेतृत्वाखाली सुरक्षित, सुसंस्कृत, आणि सुंदर फलटण नगरी उभी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
तुम्ही शांत कसे राहता कसे वागता, रामराजेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, राजे मी शांत आहे पण एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर मी करतोच. २०२२ साली फक्त महाराष्ट्र व देशाने नाही तर जगातल्या ३२ देशांनी बघितले आहे की आम्ही ५० आमदारांनी सत्तेवर पाणी सोडले. विरोधी पक्षाचे लोक सत्तेकडे येतात आम्ही सत्तेवर पाणी सोडले. या राज्यामध्ये काहींनी बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला म्हणुन आम्ही उठाव केला आणि महाराष्ट्रातल्या माता-भगिनींच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार आणले. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. पायाला भिंगरी लावून कल्याणकारी योजना केल्या, याला रामराजे साक्षीदार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
येथील लाडक्या बहिणींवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, अन्याय होत आहे, घाबरवले जात आहे, या विषयी काही अर्ज एकनाथ शिंदे यांच्याकडे सभास्थळी देण्यात आले. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अधिकार्यांनी कुठलेही बेकायदेशीर काम करू नये. खोट्या तक्रारीला संधी देऊ नये. कोणी दबाव आणत असेल तर त्या दबावाला बळी पडू नये. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदेबरोबर आहे. मी त्रास देत नाही पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नसल्याचा विरोधकांना इशारा देत हे सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, न्यायाचे सरकार असून अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचा विश्वास शिंदे यांनी उपस्थित जनतेला यावेळी दिला.
आचारसंहिता संपल्यावर फलटण शहरातील सगळे रस्ते नगर विकास खात्याच्या माध्यमातून चकाचक केले जातील. शहराचा ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करणार असून शहराच्या चारी दिशेला प्रवेशद्वारे उभारून फलटणचा चेहरा आपण बदलून टाकू. अर्थात हे सर्व रामराजेंची परवानगी घेऊनच करणार असल्याचे सांगत हडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या वसाहतीमधील रहिवाशांचा संपलेला करार नव्याने ९९ वर्षांचा फेर करार करून देण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना एकनाथ शिंदे यांनी यावेळी सुचना केली.
रुग्णालयाच्या विस्ताराची मागणी होताच एकनाथ शिंदे यांनी आरोग्य मंत्र्यांना भरसभेत फोन लावला. पन्नास बेडचे असलेले रुग्णालय शंभर बेडचे करण्याचे ताबडतोब आदेश दिले. पालकमंत्री यांच्यासोबत फलटणला येऊन रामराजेंसोबत बैठक घेण्याचे सांगितले. यावर मंत्री म्हणाले, शंभूराजे देसाई यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावतो आणि उद्घाटनाला तुम्हाला बोलवतो. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उदय जी फलटणच्या एमआयडीसीचे एक्सपान्शन करायचं आहे. यावर मंत्री सामंत म्हणाले, सुरवडी, निंभोरे, ढवळेवाडी, मिरगाव, आणि नांदल या पाच गावांमध्ये २८४ हेक्टरवर एमआयडीसी प्रस्तावित आहे. शेतकर्यांसोबत वाटाघाटी सुरू आहे. निवडणूक संपल्यावर फलटणमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण सभा घेत आहोत. फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने फडकला पाहिजे. शिवसेना आणि आघाडीचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करून नगरपालिकेत पाठवायचे आहेत, यासाठी राजेंचे घर आपल्या सोबत असून रामराजेंचा व कुटुंबीयांचा असलेला अनुभव फलटणमध्ये नवा इतिहास, नवी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अमित पवार, बजरंग नाना खटके, महिला आघाडीच्या शारदा जाधव, अविनाश फडतरे, रेश्मा भोसले, संदीपकुमार जाधव, नानासाहेब ऊर्फ पिंटू इवरे, दत्तात्रेय बापू अनपट, विराज खराडे, चंद्रकांत जाधव, दादासाहेब चोरमले, माडकर आप्पा यांची भाषणे झाली.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐतिहासिक पगडी व तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीरनामाचे प्रकाशन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. आभार व सूत्रसंचालन रणवरे सरांनी केले.
सभेला शिवसेना पक्ष व आघाडीचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील महिला, तरुण, वयोवृद्ध यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...